हौस म्हणून भटकलो तेव्हा अगदीच अल्लडपणे वाटेल तेव्हा बाहेर निघायचो. आता मात्र ठरऊन काही जागी जावचं लागतं, तिथली सगळी सोय बघावी लागते. मग ग्रुप जमवा, त्यांना फिरवा. आपसुकच आपण त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणींचा एक छोटा हिस्सा बनतो. मग महिना बदलतो, पुढच्या महिन्यातला ट्रेक येतो. अस करत करत एवढ्या काळात शरीराने आणि मनाने या प्रक्रियेशी जुळवुन घेतलय. शनिवार रविवारचा प्रवास, बदलणारं पाणी, अनियमित आहार, अपुरी झोप अस सगळं मानवलं. दर रविवारी नवीन लोकं. या क्षेत्रात फक्त भौतिक सुविधाच नाही तर तुम्ही लोकांशी वैयक्तिक पातळीवर काय आणि कस बोलता यावरसुद्धा बरचं काही ठरत. पहिल्यांदाच भेटून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्यासाठी अनोळखी डोंगर चढवणे यासाठी त्यांचा विश्वास संपादन करायला लागतो. म्हणून प्रत्येकवेळी त्याच इमानदारीने त्यांना सामोर जावं लागतं. आपला मुड कसाही असो, त्याचा त्यांच्या अनुभवावर परिणाम होऊ नये.
या काही वर्षांच्या अनुभवातच शरीराने आणि मनाने सततच्या भटकण्याशी जुळऊन घेतलंय. थकवा आणि निराशा निदान फिरताना तरी डोकावत नाही. इव्हेंट सुरू झाल्यावर जणू सगळ्या भरून आलेल्या गोष्टींना मी पॉज म्हणतो आणि या पूर्णपणे वेगळ्या विश्वात दाखल होतो. कालच्या रायगडचचं बघा ना. ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसायचं काम माझ्याकडं असतं. रात्री 12 ला पुण्यातून निघलो. शहरातले रस्ते रिकामेच अधिक शोभत होते. सोडिअमच्या पिवळ्या बल्बखाली काही ललना सेल्फी काढत होत्या, पोरं नागमोडी रेषेत रिकाम्या रस्त्यावर ड्युक पळवत होते. चडीचूप झोपलेली गावं, त्यांच्या जवळच कुठंतरी झाडाखाली लोळत असणारा बेवडा, 4 लाच उठलेला म्हातारा आणि हे सगळं बघत असताना ड्रायव्हर काकांशी गप्पा. सकाळी पायथ्याला आवरून अभ्यास सहल सुरू झाली. पुन्हा नवीन लोकं, त्यांची आपाआपली समांतर विश्व. सारंग किल्ल्याचा इतिहास सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य, तर समाधीचं दर्शन घेताना कोणाच्यातरी डोळ्यात साठलेलं ते सगळं. हे विश्व असं सुंदर असतं. त्यात असताना आपल्याला मात्र वाहून जाता येत नाही. घड्याळीकडं, सेल्फीवाल्यांकडं नीट लक्ष असत. पण तो ही त्या विश्वाचाच भाग. आपलं विश्व ते पुण्यातुन गाडी धकल्यावर मागेच राहिलेलं असतं. धुक्यात अंदुक दिसणारे, चिंब भिजून काळेशार झालेले अवशेष आपल्याभोवती एक गारुडचं निर्माण करतात. उतरताना महादरवाज्यात दिलेली घोषणा, तेव्हा शरीरात चमकलेली वीज, त्या महान आत्म्याबद्दलचा वाढणारा आदर. महादरवाज्याच्या बुरुजाच्या अफाटपणाकडे भाराऊन अर्धा मिनिट बघत असलेले डोळे आणि तिथून पुढच्या पायऱ्या उतरत असताना सगळ्यांमध्ये पसरलेली पुसटशी शांतता. उंची जसजशी कमी होते तसा पाऊस कमी होतो, धुकं सरकत आणि ज्या परिसरात आपण सकाळपासून आहोत तो सगळा परिसर अचानक स्पष्ट दिसायला लागतो. नजर जाईल तिथपर्यंत झाडांचा हिरवा आणि पाण्याचा पांढरा अश्या दोनच रंगांचे शेड दिसतात. कित्येक धबधबे. पटापट सगळे जण मोबाईल काढतात आणि फोटो काढून झाले की एक क्षण सगळं नीट न्याहाळतात आणि मी आवाज दिला की चालायला लागतात, माना मात्र पुन्हा पुन्हा मागे वळत असतात. त्यातलं कोणीतरी फोटो सोडून शांतपणे ते सगळं मनात साठवत असतं, ये जवानी है दिवानी मधला रणवीर कपूर त्या हिमशिखरावर जे एक्सप्रेशन देतो ना बस्स तोच सिन.
परतीच्या प्रवासात ताम्हिणीघाट सगळा धुक्याने भरलेला. पाच फुटावरच दिसत नाही, त्यात खड्यांसोबत सापशिडी खेळतोय. आपल्या डोळ्यात आता या थकव्याने झोप यायला चालूच झालेली असते की अचानक गाडीसमोर 5 फुटांचा कुठलातरी पट्टेदार साप दिसतो. काही तरी खाल्ल्यामुळे त्याची गती मंदावलेली, जमेल तितक्या जवळुन त्याला हॅलो म्हणणं आणि पुढं धकन. प्लेलिस्ट मधले सगळे दर्दी जुने गाणे ऐकून लोकांची एक झोप झाली की मधुरा मॅडम त्यांच्या मधुर आवाजात त्यांचं सिग्नेचर “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” म्हणतात. पुन्हा कोणीतरी आपापल्या आवडीच्या गाण्यांवर आपला गळा आजमावत. मग आपणही प्रयत्न करतो. पण “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनांदत होता” गात असताना आपण पुन्हा आपल्या पुण्यात मागे सोडून आलेल्या विश्वात एन्ट्री मारतो, ट्राफिक सिग्नल चालू होतात, गर्दीचा आवाज, प्रदूषण, गर्दी, आणि मग जाणवतो थकवा आणि बाकी विसरून गेलेलं सगळच. पडल्या पडल्या झोप लागते. आणि सकाळी दहा ला क्वांटम मेकानिक्सच लेक्चर सुरू असताना हे सगळं लिहायचं सुचतं. मग चहा मारत संपवतो लिहून. दादा… अजून एक कटिंग!
सोमेश सहाणे ©
2 Comments
Hi Mi Akshay Harichandra Nimbalkar
Monodeep sir khup Chan
Mi aplyala nehami follow karat aahe
Aata website ashlemule ankhi soiskar zale aahe
Mazhi pan ecaha aahe tumche barobar traik la yaychi pan kamamule julat nahi
Pan ekda Nakki yeli.
Thank You Akshay…Aapan Nakkich Bhetuyat..Tula Shubecha..