वाजले किती ते कळलं नाही पण दोन-अडीच तास झोप झाली असावी कदाचित. साडेतीन वाजून गेले होते बहुधा. उठून बसलो. शेजारी दिवसभर प्रवास करून, रात्री काजवे बघून आणि माझीच ऐतिहासिक बडबड ऐकून, थकून गाढ झोपलेले सवंगडी होते. रात्री उशिरा कितीतरी वेळ बाहेर आवारात येणारे लोक, त्यांचे आवाज, गाड्या, कोलाहल सगळं शांत झाल होतं.
थोडसं पाणी पिऊन बाहेर पडलो. मंद पहाटवरा सुरू झाला होता. आदल्या संध्याकाळी पद्धतशीर पाऊस पडून गेला असल्यामुळे चांदण्यारातीची वगैरे भानगड नव्हती. अमृतेश्वर काही लांब नव्हता. मोजून साडेतीन मिनिटे चालल की आल देऊळ. चांगली फरसबंदी वाट थेट देवळापर्यंत. बाहेर एक सोडून दोन दोन नंदी. त्यातला एक मुलनिवासी म्हणजे तिथलाच आणि एक “बाहेरून आलेला किंवा आणून ठेवलेला”. देऊळही फार मोठ नाही. मोठ नसल तरी आहे मात्र प्रचंड म्हणजे अति सुंदर. बारीक कोरीव काम. दहा सेंटीमीटर ऊंची भरेल एवढ्या छोट्या पण सुबक मुर्त्या कोरलेल्या. अगदी पायथ्यापासून कळसापर्यंत आणि द्वारापासून गाभार्यापर्यंत. छोटासाच सभामंडप आणि साधारण पंधरा फुट खोल असलेल गर्भगृह आणि त्यात असलेल सुंदर शिवलिंग. कसही किमान १००० वर्ष तिथे असलेलं. काय काय आणि किती किती पाहिलं असेल याने आणि सहनही किती केलं असेल.
त्याला कसलाही चेहरा नाही, दागदागिने नाहीत, फुलापानांनी त्याचा जीव गुदमरलेला नाही की रांगेचा आणि पुजारी-पहारेकर्यांचा बंदोबस्त नाही. मी त्यात जाऊन बसलो. नमस्कार केला. चांगलं खड्या आवाजात शिवतांडव जेवढं पाठ आहे तेवढं म्हटलं. थोडा ओम नमः शिवाय चा जप केला. हा जटाधारी रुद्र माझा एकमेव आवडता देव. आदीयोगी, नटराज असं बरंच काही असणारा. पण त्याही पेक्षा महत्वाचं हे की डोंगरात राहणारा. अगदी सिद्धगडा सारख्या शंभर टक्के उद्धवस्त गडावर देखील उन्हातान्हात, पावसापाण्यात कुठल्याही छप्परा-भिंतीविना हा त्याच्या नंदीबरोबर ठाण मांडून बसलेला आहे.
बाहेर आलो आणि आवाराच्या भिंतीला टेकून शांत बसलो. म्हटलं बघू डोळे बंद करून ध्यान वगैरे लागतंय का. ध्यान सोडून बाकी सगळं लागलं. ऑफिस, प्रोजेकट, शहर, घर, कटकटी आणि काहीबाही आठवत राहील. मरू दे म्हटल. उगीच उठलो च्यायला. उठून हे गचपान आठवण्यापेक्षा गप झोप्लो असतो. डोळे उघडले. अंधाराला नजर सरावली होती एव्हाना. समोरच दिसत होता रतनगड. त्याला पाहिलं आणि अचानक आठवल्या अशा कितीतरी पहाटवेळा, रायगडावर काढलेल्या. भूषण म्हणतो तस “शिवसेवक शिवगढपती” असलेल्या “त्याच्या” समाधीसमोर शांतपणे बसून त्यालाच आठवलेल्या.
डोळे बंद केले आणि काही क्षणातच जगदीश्वर आणि समाधी दोन्ही ठळकपणे उभ्या राहिल्या समोर. भोवताल पुन्हा एकदा शांत वाटू लागला होता. मस्त वाटत होतं. बसल्या बसल्याच आठवतील तेवढे सगळे छंद म्हटले भूषणाचे. कविता म्हटल्या. अनेक गोष्टींमुळे गेल्या दोन तीन आठवड्यात मनावर आलेलं मळभ आपसूक दूर झालं होतं. ही ताकद फक्त सह्याद्रीतच. त्याच्या या गडाशिखरांवर. या राहाळांत, या मातीत. आपण नक्की कोण हे आठवायला ती मदत करते, निदान मला तरी.
कुणी विचारलं न की देव कुठे असतो, तर माझं उत्तर असेल की हे काय इथं सह्याद्रीत.
मस्तपैकी फिरून पुन्हा अंथरुणाकडे निघालो. येणारी झोप आता सुखनिद्रा असणार होती. पुण्याला परत जाताना पुढच्या मोहिमेपर्यंत ती जगण्याचं बळ देणार होती.
– रंगो भोईर (सारंग भोईरकर)
4 June 2018, Pune