मनोदीप अचानक रात्री दहा वाजता रूमवर आला. म्हणे चल खूप बोर होतय, राजगडाला जाऊन येऊ. सह्याद्री वेड लावतो त्या काळात अशे प्लॅन बनणं अगदी सहाजिक असतं. मागच्या ट्रेकवरून आल्यावर न धुतलेले सॉक्स, मातीने पांढऱ्याचे लाल झालेले बूट, हलके कपडे, रुमाल, बिस्कीट, चिवडा, पाण्याच्या बाटल्या, अस सगळं जुजबी साहित्य बॅगेत तयार असतं. महाविद्यालयीन आयुष्यात फार खर्च न करता, कुठलही प्रशिक्षण न घेता, न वाचता, मिळेल त्या वाहनांनीशी, साधनांनीशी किल्ले फिरणं हे आता सामान्य झालं होतं. पुण्यातल्या इतर ट्रेकर्स मंडळींप्रमाणे. दुचाकीवरून तिथं पोहोचे पर्यंत चर्चेत किल्ला नसतो सुद्धा, स्वराज्याची पहिली राजधानी होती एवढंच काय ते शाळेतल्या पुस्तकातलं माहीत होतं. अशाप्रकारे नवरात्रीच्या 7 व्या दिवशी रात्री 12 ला आम्ही गुंजवण्यात पोहोचलो. महामार्ग सोडून जसजस आपण आत जातो तसतस थंडी वाढते. डोंगरांची संख्या वाढते, पुन्हा एकदा घरी आल्यासारखं वाटतं. आमच्या दोघांनाही ट्रेक नवीन नव्हता म्हणून पटापट दोन दमात वर गेलो. आधी लागतो एक झाप मग सुरू होतं जंगल, त्यानंतर एका छोट्या टेकडीवर थोडी सपाट जागा, मग लागतो चढ आणि मग अगदी निमुळत्या रस्त्यावरून आपण चोरदेवाज्याच्या खाली पोहोचतो. तिथली चढण काहीशी अवघड. पण ग्रील लावल्याने फार काही वाटत नाही. मग चोरदरवाजा येतो. दरवाजा कसला, एक छोटी देवळीच ती. खाली वाकून जाताना पाठीवरची बॅग वर लागून आपण काहीशे अडकतोच आपण. तिथून वर काही पायऱ्या चढलो की आपण राजगडावर पोहोचतो. रात्री खालच्या सगळ्या गावांतील पथदिवे लुकलूक करत असतात. सगळं जग निवांत झोपलं असताना आपण थकून भागून या डोंगरावरून त्यांच्याकडे बघत असतो. पुण्यातले शास्त्रीय संगीत ऐकणारे लोकं जस्टीन बिबरच्या फॅन्सकडे ज्या तुच्छतेने बघतात त्याच तोऱ्यात आपणही जगाकडे बघतो. ही विशेषत्वाची भावना हवीहवीशी असते. रात्री ट्रेक केल्याने आपण नेमकं कुठे आहोत याचा फारसा अंदाज आपल्याला येत नाही. थोडं निवांत बसलं की थंडी वाजते, आणि शेकोटी करेपर्यंत आपण कुडकुडत असतो. तो शनिवार रविवार नव्हता म्हणून गडावर फार कोणी नव्हतं. पद्मावती मंदिरात जागा होती. तिथं आम्ही पडलो. सकाळी लवकरच उठून बालेकिल्ल्यावर जायचं ठरलं होतं. तेव्हा मला मनोदीपने एवढच सांगितलं होतं की रस्ता अवघड आहे, रात्री नको जायला. पण सकाळी उठून मंदिराबाहेर पडलो आळस देताना उजव्या बाजूला बघितलं आणि थबकलोच. हा तर डोंगरावर डोंगर. किल्ले बघितले होते पण हे अदभूतच. एवढ्या मोठ्या डोंगरावर एक निमुळता, खडा छोटा डोंगर. हा बालेकिल्ला. बालेकिल्ल्याची वाट कठीण. पण ग्रीलवर भार देऊन चढण सोपं जातं. अवघड पॅच संपले आणि मुख्यदरवाजा आला. बांधकामात अतिशय कुशल असणाऱ्या एखाद्याने असा रेखीव दरवाजा आणि भक्कम बुरुज बांधले असतील. जिथं उभा रहायला जागा नाही तिथं एवढ भव्य बांधकाम. तिथं एक सेल्फी काढून दरवाज्यावर गेलो. सकाळचे साडेसहा वाजले असतील. सुंदर सूर्योदय होता तो, सूर्याचा पिवळा-भगवा प्रकाश समोरच्या नदीच्या पात्रातून अधिकच डोळ्यात भरत होता. नजर जाईल तिथपर्यंत मोकळं वातावरण त्याच त्या प्रकाशनं भरून गेलं होतं. समोर दिसणाऱ्या पायऱ्या चढून अजून वर गेलो. समोरच चंद्रकोर तळ. शिताफीने त्याचा तो आकार घडवलेला. तिथं तोंडावर पाणी मारत नाही तोपर्यंत सूर्याच्या सौंदर्याचं उन्हात रूपांतर झालं होतं. सकाळी 7ला सुद्धा उन्हाचा चटका लागू लागला आणि सोबत एवढ्या जास्त उंचीवर वारा ही अंगात भिनू लागला. मग अजून थोडं वर गेलो तेव्हा राजगडाचा घेरा लक्षात आला. आम्ही ज्या माचीवरून वर आलो ती पद्मावती माची आणि अजून तिच्याहीपेक्षा लांब असणाऱ्या संजीवनी आणि सुवेळा माची वरून दिसल्या. गडाचा मुख्य दरवाजा पालीच्या बाजूने. आणि चोर दरवाजे तर बरेच. भक्कम तटबंदी अजून तशीच शाबूत फक्त वर बांधलेले लाकडाचे घर काळासोबत टिकले नाही. याआधी तोरणा बघून झाल्याने तो पटकन ओळखता आला. बाकी किल्ले तशे उमगले नाहीत, पण टॉवर अंदुक दिसत असल्याने सिंहगड ओळखू आला. या दोन्ही माच्या दिसायला देखण्या, पण फार छान फोटो येतील अशे कॅमेरे नव्हते. ऊन वाढत असल्याने जरा गरबड केली. मग उजव्या हाताच्या बुरुजाजवळ जाऊन फोटो काढले, वर सदरेसमोर गेलो, मुजरा घातला, दोन मिनिटं शांत बसलो आणि उतरायला सुरुवात केली. हिवाळ्यात ऊन पटकन वाढतं. म्हणून न थांबता एका दमात खाली आलो. ही राजगडाची पहिली भेट. अफाटतेने भारावलो आणि अजून फिरायची, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली. पहिल्याच भेटीत आता हे आपलं घरच होणार हे राजगड फिरलेल्या प्रत्येकाला जाणवतच अस म्हणतात, ते मलाही जाणवलं.
नंतर माझ्या आणि काकांच्या वाढदिवसाचं निमित्त एकत्र करून एकदा आलो, मग परीक्षा संपल्यावर कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना घेऊन आलो. एकदा तर 27 लोकांच्या ग्रुपला रात्री राजगड फिरवला. सकाळी उठून त्यांना बालेकिल्ल्याच्या दरवाज्यात नेलं. मला माहित असलेली किल्ल्याची जुजबी माहिती त्यांना सांगितली. सगळे किल्ला बघण्यात आणि तो फोटोत टिपण्यात भारावुन गेले होते. आणि अजूनही अशाच प्रासंगिक कारणाने पद्मावती माची आणि बालेकिल्ला असा राजगड बऱ्याचदा फिरलो. एकदा तीन मित्रांना घेऊन रात्रीच सगळं फिरलो आणि पहाटे परतलो. रात्रभर भुताखेताच्या गप्पा सुरूच होत्या. त्यातल्या एकाला, रामला माझ्यासारखच या किल्ल्याचं वेड लागलं. भर मे महिन्याच्या 5 तारखेला याला राजगडावर जाऊ वाटलं. तिथलं ऊन मला माहित होतं पण त्याला समजवणं शक्य नव्हतं. म्हणून शेवटी आम्ही दोघच रात्री किल्ल्यावर गेलो. रात्रीची चढाई आता नवी नव्हती, वाट जवळ जवळ पाठ झाली होती. वर तारामंडल लायटिंग लावल्यासारखं चमकत होतं. जितकं वर जाऊ तितकं आकाश स्पष्ट होत होतं. बरीच वाट तर टॉर्च बंद करूनच चढलो. रामचं वाचन अफाट म्हणून मलाही नेहमीप्रमाणे हवे ते, हवे तितके प्रश्न विचारण्याची पर्वणी. ट्रेक सूरु करताना वनविभागाबद्दल काहीतरी बोलत होतो आणि नंतर विषय कुठं कुठं गेले ते आता नीट आठवतही नाही. गप्पांच्या भरात कधी पद्मावती मंदिर गाठलं कळालही नाही. दोघांनी विचार केला की रात्रीच बालेकिल्ल्यावर जाऊ, वर मस्त वारं असेल. म्हणून रात्रीच सगळा बालेकिल्ला फिरून घेतला. सदरेजवळ जरा बसलो तर अगदी पाचच मिनिटात कुडकूडू लागलो. पण बोलण्याच्या विषयांमुळं उठु वाटत नव्हतं. अगदी मानवी इतिहासापासून, राजकारण, कला आणि विज्ञान अस कित्येक विषयांवर विचारमंथन झालं. मंदिराच्या आडोश्याला पडलो तेव्हा चार वाजले होते. म्हणजे मागच्या 6 तासांपासून आम्ही प्रश्न उत्तरात रमलो होतो. आता उत्तर द्यायची वेळ माझ्यावर होती, कारण माझ्या विषयातले प्रश्न पडले. हा तारा कुठला? हे विश्व का पसरतय? रिलेटीव्हीटी काय सांगते? मग जगाच्या उत्पत्ती वगैरे पर्यंत पोहोचलो. पण रामने शेवटी विचारलं की, का जगायचं असतं रे? अगदी पाठ केलेलं किंवा तत्वज्ञानी उत्तर त्याला हवं नव्हतं तर मुळात ज्या विश्वाच्या उत्पत्तीची आपण चर्चा करतोय त्या परिपेशात आणि प्रमाणात आपल्या आयुष्याचं कारण कस शोधणार? याच माझ्याकडं मोडकं तोडकं उत्तरही नव्हतं. म्हणून मी दिलही नाही आणि त्याने परत विचारलही नाही. दोघेही उत्तराचा विचार करत आकाशाकडे बघत राहिलो, थोडा वेळ डोळा लागला पण लगेच सूर्य वर आला. त्या उगवत्या सुर्यासोबत त्या दिवशी चर्चेतून रुंदावलेल्या ज्ञानाच्या कक्षा, आयुष्यबद्दलची उत्सुकता सगळं जणू खुणावत होतं. त्या मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हातही आम्ही सुवेळा माचीच्या टोकापर्यंत जायचं ठरवलं. सकाळी पद्मावती मंदिरात एका गावकऱ्याकडे पोटभर पोहे खाल्ले आणि चालायला सूरु केलं. माचीवर जाताना त्या माचीला जायचा दरवाजा लागतो, त्या माचीवरही अजून एक सदर दिसते. समोर चिलखती बुरुज लागतो, आणि तिथून मागे बालेकिल्ल्याचं दिसणार महाकाय रूप. कुठल्याच बाजूने चढता येणार नाहीत अशे कडे उन्हात अगदी स्पष्ट चमकत होते. पिवळ्या गवतातून बालेकिल्ल्याचा दरवाजाही दिसत होता. त्या चिलखती बुरुजातुन खाली उतरलं की लागतं नेढं. समोर धावत गेलेल्या निमुळत्या डोंगराच्या मध्यभागी एक छिद्र. किल्ला चढताना डाव्या हाताला जे स्पष्ट दिसत तेच. त्या छिद्रात जाऊन बसलो. तिथं मोठ्ठ आग्यामोहोळ नेहमी असतं हे ऐकून होतो, ते त्या दिवशी बघितलं. एवढ्या कडाक्याच्या उन्हामुळं तिथून निघु वाटत नव्हतं. तरी माचीचा घेरा अजून बराच पुढपर्यंत होता. ही वाट निमुळती होत जाते आणि शेवटी माचीचं टोक लागतं. तिथून राजगडाची भव्यता नजरेत सामवता येते. उतार चढ सर करून परत पद्मवतीला पोहोचे पर्यंत उन्हाने जीव काढला होता. म्हणून खाली उतरावं लागलं. रणरणत्या उन्हात राजगड फिरणं हा थकवणारा अनुभव असला तरी हिरवी शाल काढून अवशेषांची भव्यता आणि किल्ल्याची दुर्गमता दाखवणारा राजगड बघायची इच्छा असेल एकदा जरूर जावं, पण जास्तीचं पाणी सोबत घेऊन.
मी आणि मनोदीप ने मिळून trekism adventures and outdoors या नावाने किल्ले फिरवणारी कंपनी चालू केल्यानंतर बराच काळ आम्ही प्रकाशझोतात नसलेल्या किल्ल्यांवर ट्रेक्स आयोजित करत होतो. पण सोबतच सांरंग भोईरकर आणि सारंग मांडके यांच्या अभ्यासु लेखनाबद्दल, फिरस्तीबद्दल फेसबुकवरून माहितीही मिळत होती. त्यातून आपण किल्ल्यांच्या इतिहासाबद्दलच्या अभ्यास सहली आयोजित कराव्यात अस ठरलं. दोन दिवस रायगडवर अभ्यास सहल झाली तेव्हा राजगडाच्या अभ्यास सहलीची कल्पना सुचली. म्हणून त्या दृष्टीने नियोजन करायला पुन्हा एकदा राजगडाला जायचं ठरलं. मी आणि सारंग भोईरकर रात्रीच निघलो. राजगडच्या इतिहासाबद्दल गप्पा चालू होऊन संपेपर्यंत जवळ जवळ न थांबताच वर गेलो. रिमझिम पाऊसही सुरू होता. पद्मावतीवरच्या खुल्या जागेत आम्ही टेंट टाकला आणि झोपलो. सकाळी उठून बघतोय तर सगळा गड जणू फुलला होता. एवढ्या वर्षात पाहिलेल्या सर्वांत सुंदर दृश्यांपैकी एक दृष्य आम्ही तेव्हा बघत होतो. पाऊस पडून जातो आणि सकाळचं धुकं डोंगरांच्या बाजूने गच्च भरून येतं. कधी साफ होतं, अवशेष अर्धे उघडे पडतात तर कधी दहा फुटांवरचही दिसत नाही. समोर दिसणारा सगळ्या परिसरात फक्त पांढरा आणि हिरवा अशे दोनच रंग दिसत असतात. हीच ती दुर्मिळ वेळ जेव्हा हे दृश्य दिसणं फक्त नशिबाच्या हातात असतं. यावेळी आमच्याकडे कॅमेरा असल्याने हे सगळं व्यवस्थित टिपताही आलं. बरच फिरायचं होत म्हणून सामान आवरलं. काही जाणकारांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांच्या मदतीने ज्या बारीक सारीक जागा शक्यतो आपल्या नजरेस येत नाहीत त्या बघितल्या. तिथचं खरे महत्वाचे अवशेष दडलेले होते. सारंगने ते याआधीही बघितले होते. पण मी इतक्या वेळेस इथं येऊनही माझी नजर त्यांच्यावर पडली नव्हती. हे अवशेषच इतिहासाचे प्राथमिक पुरावे असतात, म्हणून किल्ला फिरताना या प्रकारची दृष्टी असायला पाहिजे. एवढं फिरून, ऐकून वाचूनही नेमकं किल्ला फिरायचा कसा? हे नीट कळालं नव्हतं. पण या प्रश्नाचं उत्तर आणि प्रात्यक्षिकच मी तेव्हा अनुभवत होतो. तो दिवस विशेष होता, एवढ्या परिचयाच्या जागी सुद्धा एवढं गूढ काहीतरी दडलेलं असत ते उमगण ही प्रक्रिया अद्भुत होती.
याच्या दोन आठवड्यांनंतर आम्ही राजगडाच्या अभ्यास सहलीचा इव्हेंट जाहीर केला. अगदी 20-25 लोकं येतील अशी अपेक्षा होती. पण शेवटच्या दिवशी अचानक संख्या 78 वर गेली. एवढ्या लोकांचं नियोजन करण्याची ती पहिलीच वेळ होती. पण मदतीला स्वयंसेवक होते, walky talky मुळं काम सोप्प झालं. जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून पुण्यातूनच जेवण घेऊन निघलो होतो, ते लोकांनाही आवडलं. राजगडाच्या निमुळत्या वाटांवरुन एवढी गर्दी सोबत फिरताना बघण्याची माझीही ती पहिलीच वेळ होती. महत्वाची गोष्ट म्हणजे यातला प्रत्येक जण फोटो काढायचेत या उद्देशाने नाही तर किल्ला समजून घ्यायचाय या उद्देशाने आला होता. त्या दिवशी पाऊस, धुकं खुप होतं, निसर्ग तर फुलला होताच, लोकांचा उत्साह ही वाढत होता. सगळे महत्वाचे अवशेष दाखवून त्यांची माहिती सांगून झाल्यावर शेवटी सगळ्यांना पाली दरवाज्यात एकत्र केलं. आतापर्यंत त्यांनी अनुभवलेली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यासाठी नवीन होती. दरवाज्यात मात्र सारंग सारंग ने महाराज्यांच्या आयुष्यात भावनिक पातळीवर राजगडाचं स्थान काय होत हे समजून सांगाणाऱ्या काही गोष्टी ऐकवल्या. ज्या दरवाज्यात सगळे बसले होते, तिथं पडलेल्या पावलांच्या गोष्टी सांगितल्या. बऱ्याच जणांनी आपसूक डोळे पुसले, कोणी पुसलेही नाहीत. पण आतून त्याक्षणी सगळेच प्रचंड भारावलेले होते. तरुण, लहान मुलं, वृद्ध सगळेच. वातावरण धुक्याने गच्च भरलेलं होतं, रिमझिम पाऊसही होता, आणि त्या भारावलेल्या भावनांना वाट करून द्यायला सारंग ने घोषणा दिली. महाराज… घोषणा पूर्ण होईपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून राजगडाच्या प्रत्येक दर्शनाची स्मृती डोळ्यांसमोरून गेली. रात्र, दिवस, पाऊस, थंडी, ऊन, फोटो, गप्पा, अनुभव, इतिहास, सगळं सगळं भरून आलं. त्या प्रत्येक राजगड वारीचा सार म्हणजे ही भावना होती… जय जय जय.
सोमेश सहाणे ©
2 Comments
Khup divsa nantr …itka sunder blog vachla….mala swatala vatla …raigad firtey…. amazingly written ❤
Amazing website..
Hope will meet soon for adventure experiences.🤗
Thank You Harshali..