कडकडीत उन्हाचा अनुभव घेऊन कालच रायगडावरून परतलो. “उन्हाळी चांदण्यात गड फिरण्यात एक मजा असते” वगैरे वाक्य आता लिहिताना गोड वाटतात, पण दोन दिवस उन्हाने कंप्लीट कांडप काढलं होत. एप्रिल सोडला तर उरलेल्या प्रत्येक महिन्यात कधी ना कधी मी रायगड बघितला आहे. एप्रिलचा विषय पण लवकरच पूर्ण होईल. असो.
रायगड आता जरा जरा परिचयाचा झाला आहे पण संपूर्ण ओळख मात्र पटलेली नाही अजून त्याची. त्यासाठी अजून खूप वेळा त्याची वारी करावी लागेल. खूप, खूप वाचन आणि अभ्यास अजून बाकी आहे.
पण जेवढा पहिला आहे आणि आवळसकर,गो.नि.दांडेकर, डॉ. पराडकर, घाणेकर आणि इतर अनेक जण यांच्या संशोधनातून जेवढा समजावून घेता आला आहे, तेवढा इतरांना दाखवू मात्र शकतो, गेल्या अनेक वेळा तर कोणी तरी सुहृद सोबत होतेच. निमित्तावरच टपलेला असतो मी आता, कुणी चल म्हणायचा फक्त अवकाश. कालच्या वारीचं पण बर्याच जणांना मी प्रॉमिस केल होत, पण मलाच ते सगळं एकत्र साधल नाही.
गडावरुन हिंडताना, बरोबर आलेल्या सवंगड्यांना गड सांगताना मेंदू आणि तोंड त्यांचं काम करत असतात आणि मन मात्र कधी कधी एका वेगळ्याच अवधानात असते. शिवाजी नावाचं चैतन्य रायगडाच्या आसमंतात भरून राहिलं आहे.
ते सगळ्यात जास्त मला जाणवतं ते समाधीपाशी. पण आपण समाधीपाशी त्या वेळी एकट असल पाहिजे मग त्याचा उत्तम अनुभव घेता येतो. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहतो अंतर्मनातून.
सह्याद्रीच्या उत्तुंग कड्यावरून खाली पाहताना आणि सभोवार न्याहाळताना, माणूस किती क्षुद्र आहे याची जाणीव होते ना अचानक, तशीच जाणीव होते तिथे. शांत बसून राहावं समाधी समोरच्या त्या दगडी फरशीवर, एक नूतन सृष्टीकर्ता आपल्या समोर चिरनिद्रा घेत असतो. त्याचे रूप, त्याचा प्रताप, त्याचा साक्षेप आठवत जातात हळू हळू. आपण तृणवत आहोत याची खात्री पटते आणि “थोडेतरी काही विशेष करावे” असं अतिशय वाटून जातं.
या वारीत सुद्धा पहाटे असाच जाऊन आलो समाधीपाशी, आणि उरलेला दिवस मनाच्या एका पातळीवर तेच विचारचक्र सुरू राहिलं. गड हिंडत होतो पण त्यातही ती “ट्रान्स स्टेट” यायचीच. त्या विचारांमध्ये मग शिवचरित्राशी संबंधित जे जे काही पाठ आहे, ऐकलं आहे, पाहिलं आहे, वाचलं आहे ते म्हटलं जातं माझ्याकडून स्वतःशीच. काल एका मित्राने ते हेरलं आणि म्हणाला सुद्धा की काय बडबडतोयेस रे?काही नाही असचं, एवढच त्याला म्हटलं.
पायथ्याला आलो, पाचाडच्या खिंडीतून जाताना टकमक आणि हिरकणी पाहून घेतले, हात जोडले. गाडी निजामपूर मार्गाला लागली, मित्रांच्या गप्पांमध्ये सामील झालो. घरी आलो आणि आंघोळीला बसल्यावर पायाची माती काढायला लागलो. कितीही वाटलं तरी ती माती अंगावर वागवू शकत नव्हतो. भावना मागे राहिल्या होत्या,व्यवहार सुरू झाला होता.
– रंगो भोईर (सारंग भोईरकर)
20 March 2017, Pune